Saturday, October 12, 2019

दोन गोष्टी

 गोष्ट जवळपास २०० वर्षांपूर्वींची. १७३० सालची. राजस्थानमधली.



जोधपुरच्या नवनिर्वाचित राजा अभयसिंगांना नविन राजमहाल बांधायचा होता. त्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळव करण्यात राजाचे मंत्रीगण लागले. सर्वप्रथम बांधकामासाठी लागणाऱ्या चुना भट्टीसाठी इंधनाचा शोध सुरु झाला. राजाने आपला मंत्री “गिरधारी दास भंडारी” यावर ती जबाबदारी सोपवली. गिरधारी दास भंडारीची दृष्टी सर्वप्रथम पडलं ती तिथून २५ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या “खेजडली” गावावरती. त्याने लगेच राजाला बातमी दिली, “इथून जवळच खेजडली नावाचे गाव आहे, त्या गावात खेजडीची (म्हणजे मराठीत शमी) बरीच झाडे आहेत, ती आपल्याला इंधन म्हणून वापरता येतील". राजाने पण त्याच्या ह्या प्रस्तावाला लगेच संमती दिली.


राजाचे शिपाई लगेच खेजडली गावाकडे निघाले. तिथे पोचताच, एका घराच्या परिसरात त्यांना खेजडीची अनेक झाडं दिसली, त्यांनी तिकडे मोर्चा वळवला. ते घर होतं, अमृतादेवींचं! अमृतादेवींने त्यांना तिथेच रोकलं. “ही खेजडीची झाडं आमच्या घरचे सदस्य आहेत, मी राखी बांधली आहे ह्यांना. मी तुम्हांला ही झाडं तोडू देणार नाही.” यावर राजाच्या शिपायांनी तिला विचारलं, “अस्सं, मग ह्या तुझ्या घरच्या सदस्यांच्या रक्षणासाठी तू काय करणार आहे?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता अमृतादेवी म्हणाली, “सिर सांचे रूंख रहे तो भी सस्ता जाण” ! अर्थात माझे शीर अर्पून जर ही झाडे जिवंत राहणार असली तर तो सौदा फायद्याचाच आहे. आता तिच्या बरोबरीने, सगळे गावकरी पण झाडांच्या रक्षणासाठी उभे ठाकले.


अमृतादेवी आणि गावकरी बिश्नोई समाजाचे होते. बिश्नोई भारतातील एक हिंदू संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाचे अनुयायी राजस्थान, हरियाणा, पंजाब,  उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश ह्या भागात राहतात. श्री गुरु जभ्भेश्वर ह्यांना बिश्नोई समाजाचे संस्थापक मानल्या जातं. बिश्नोई हा शब्द “वीस” आणि “नऊ” ह्या शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजेच जे २९ नियमांचे पालन करतात ते “बिश्नोई”. ह्या २९ नियमात, “खोटे बोलू नये, चोरी कधी करु नये” अशा सर्वांना माहिती असलेल्या नियमांबरोबरच “ हिरवे झाड तोडू नये” हाही एक नियम आहे.  


तर त्यादिवशी ते राजाचे शिपाई नरमून परत गेले. पण ह्या घटनेची वार्ता मात्र पंचक्रोशीत लगोलग पसरली. 


काही दिवसांतच  (२१ सप्टेंबर १७३०) राजाचे मंत्री गिरधारी दास भंडारी पुन्हा त्या गावात परतले, ते बरोबर सैनिकांचा ताफा घेऊन आणि सूर्योदयाच्या आधीच. सारं खेजडली गाव अजून झोपेतच होतं. सैनिकांनी गिरधारी दास भंडारी च्या आदेश दिल्याबरोबर, कामाला सुरुवात केली ती अमृतादेवीच्या घराच्या परिसरातील हिरवीगार खेजडीची झाडे कापून. त्यांचे ते आवाज ऐकून, अमृतादेवी आपल्या तिन्ही मुलींबरोबर बाहेेर आली. आणि तिने हे कृत्य तिच्या धर्माच्या विरोधात जाणारे आहे, हे सांगून त्या सैनिकांना अडवायचा प्रयत्न करु लागली. तेव्हा गिरधारी दास भंडारी उद्दामपणे तिला म्हणाला, “ठीक आहे, ही झाड आम्ही न कापण्यासाठी तु आम्हांला किती पैसे देशील?” अमृतादेवीने त्याला त्वेषाने नकार देऊन हा माझ्या धर्माचा अपमान आहे, म्हणून एका झाडाला तिने घट्ट मिठी मारली आणि जल्लोष केला, “सिर सांचे रूंख रहे तो भी सस्ता जाण”. क्षणार्धात तिचे मस्तक धडावेगळे केले गेले. तीच गत तिच्या तीन मुलींच्या मस्तकांची झाली.


ही बातमी एखाद्या वणव्यासारखी चोहीकडे पसरली. आजूबाजूच्या ऐंशी-एक गावांमधून लोक तिथे जमा झाले. सगळ्यांनी एक मताने निर्णय घेतला, प्रत्येक झाडासाठी एक गावकरी आपल्या प्राणांची आहुती देईल.  सुरुवात वृध्दांपासून केली. 


त्यावर तो पाषाणह्रदयी मंत्री उद्गारला, “ ही म्हातारी माणसं तशीही कोणाला नकोच आहेत, मग ती मेल्याचं काय मोठं लागून गेलं?” आणि त्याने सैनिकांना त्यांचे काम सुरु ठेवण्याचा  हूकूम दिला. त्याचे ते निर्मम उद्गार ऐकून सगळे गावकरी बिथरले आणि आपल्या प्राणांची आहुती देण्याची तिथे जणू चढाओढच लागली. मोठे, लहान, वृध्द, स्त्रिया सगळे सरसावून झाडांना घट्ट बिलगून उभे राहीले. आणि त्यांची मस्तकं बिलगलेल्या झाडांबरोबर जमिनदोस्त होत होती. हे कांड मात्र फार काळ सुरु राहू शकलं नाही. गिरधारी दास भंडारी ला वृक्षतोड थांबवावीच लागली. जेव्हा हे हत्याकांड संपले, तोपर्यंत एकूण ३६३ बिश्नोई समाजाचे गावकरी धारातिर्थी पडले होते. यांत ७१ स्त्रिया आणि २९२ पुरुषांनी आपल्या गावच्या खेजडी झाडांसाठी बलिदान केले होते. खेजडली गावाची जमीन तिच्याच अंगाखांद्यावर खेळणाऱ्या गावकऱ्यांच्या रक्ताने न्हाऊन निघाली होती.


ह्या घटना राजापर्यंत पोहचली. त्याचे मन विषण्ण झाले. झालेल्या अपराधाचे प्रायच्छित म्हणून त्याने ह्या बिश्नोई समाजाच्या ह्या गावकाऱ्यांच्या सन्मानार्थ ताम्रपत्र प्रसिद्ध केले  आणि मारवाड भागात यानंतर खेजडी चे झाड कधीही तोडले जाणार नाही असे फर्मान काढले. आजही ह्या भागात खेजडी झाडाला तोडत नाही.


खेजडली गावात दर वर्षी ह्या दिवशी ह्या झाडे वाचवण्याऱ्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक जत्रा भरते. इथे बिश्नोई समाजाने शहीद स्मारक बनविले आहे. दूरदूरुन पर्यावरणप्रेमी ह्यात सामील होतात.


दुसरी गोष्ट मात्र तशी इतक्यातलीच. जवळपास पन्नास वर्षांपूर्वींची.

१९७४ साली उत्तराखंड वन विभागाने रैणी नावाच्या गावाजवळच्या जवळपास ६८० हेक्टर जंगल हृषिकेश च्या
ठेकेदाराला विकले. आणि ह्या विक्रीच्या अंतर्गत तिथल्या २४५९ वृक्षतोडीचा आदेश दिला गेला. लगेचच रैणी गावात ह्या वृक्षतोडी च्या विरोधात गोपेश्वर नावाच्या गावात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्याचे नेतृत्व गौरा देवी ह्या महिलेने केले.

त्याचवेळी रस्त्याच्या कामामुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला घेण्यासाठी रैणी गावकऱ्यांना चमोली ह्या जिल्हाच्या ठिकाणी बोलावले गेले होते. वन विभागाने ह्या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. तो मोबदला घेण्यासाठी जेव्हा सगळे पुरुष चमोलीला गेले, आणि त्याचवेळी वाटाघाटीसाठी सामाजिक कार्यकत्यांना गोपेश्वरला बोलावल्या गेले. आणि ठेकेदाराच्या मजूरांना सांगण्यात आले की ते आता रैणी गावात जाऊ शकतात आणि बिनधोक वृक्षतोड करु शकतात. ते मजूर रैणी गावाकडे जात असतांना एका मुलीला दिसले आणि तिने ताबडतोब गौरा देवीला हे कळविले. गौरा देवीने गावातल्या २०/२१ स्त्रियांना अणि लहान मुलांना गोळा केले आणि जंगलाकडे धाव घेतली. आणि त्यांनी झाडांना मिठी घातली आणि ती तोडण्यास प्रतिकार केला. “हे जंगल म्हणजे आमचं माहेर आहे, ह्याला आम्ही हानी पोचवू देणार नाही”. आलेल्या मजूरांना ह्या प्रकारच्या विरोधाची कल्पना नव्हती आणि ते गोंधळले. तो पर्यत झाडांना मिठी मारुन त्यांच्या तोडीला विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढत होती. शेवटी त्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. 
हळूहळू ह्या आंदोलनाची बातमी इतर भागात पोहोचली आणि एका दशकाच्या आत संपूर्ण उत्तराखंडामध्ये हे आंदोलन पसरले. आर्थिक फायद्यासाठी होणारी जंगलतोड वाचविण्यासाठी शेकडो लोक पुढे आले. ह्या स्त्रियांची संख्या उल्लेखनीय होती. पुढे जाऊन ह्या आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध नेते सुंदरलाल बहुगुणा ह्यांनी केले.

ह्या आंदोलनाची उपल्बधी म्हणजे, तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षासाठी हिमालयीन जंगलामध्ये वृक्षतोडी वर बंदी टाकली.  १९८७ साली ह्या आंदोलनाला “ सम्यक जिविका पुस्काराने (Right Livelihood award) सन्मानित केले.

ह्या आंदोलना आदी जंगलांकडे केवळ व्यापारी दृष्टीकोनातून बघितले जात होते. ह्या आंदोलनामुळे सामान्य लोकांनी त्या जंगलांचं पर्यावरणीय महत्व जगासमोर आणलं. 
हे आंदोलक झाडांना कापण्यापासून वाचविण्यासाठी  “चिपकाके खडी हो जाते थे”, म्हणून हे आंदोलन हे “चिपको” आंदोलन. चिपको आंदोलनाचे घोषवाक्य आहे:

क्या हैं जंगल के उपकार, मिट्टी, पानी और बयार।
मिट्टी, पानी और बयार, जिन्दा रहने के आधार।


(बयार - हवा )

Saturday, August 17, 2019

शेवटाची सुरुवात

 नेहमीप्रमाणे रात्री झोपण्याच्या आधी पुष्कर डायरी लिहीत होता ….



“आज तिने ब्रंच घेत असतांना मध्येच विचारलं, कशाला भेटायचंय पुढच्या रविवारी? … आणि मी
एकदम दचकलो. हा एवढा टोकाचा प्रश्न तिच्या मला अनपेक्षित होता …”


अनपेक्षित ? पुष्कर त्या शब्दावर अडखळला. खरंच, हे सगळं आपल्याला अनपेक्षित होतं? 


गेले चार महिने तो आणि ती भेटत होते. म्हणजे तसं भेटणं फक्त विकेंडलाच व्हायचं, texting/chatting मात्र
इतर दिवशी पण सुरु असायचं. दोघांची  वय वाढलेली पण त्यामानाने डेटिंग चा अनुभव शून्यात जमा होणारा.
जेव्हा डेटींग चं वय होतं, तेव्हा त्यांना आपापल्या आयुष्यातली नवनवीन आव्हाने, ज्ञानाची क्षितीजे खुणावत होती.
घरच्यांनी जमेल तसे, जमेल तेव्हा म्हणून पाहिलं, पण  “कुणा बरोबर असणे किंवा कुणीतरी सोबत असणे” ह्या
गोष्टीला त्यांच्या कडून हवं तसं प्राधान्य हवं त्या वेळी न दिल्या गेल्यामुळे ते दोघे आता आयुष्याच्या ह्या
अडनिड्या वयात एकमेकांना भेटून सहजीवनाच्या शक्यता पडताळून बघत होते. आणि त्या दो़घांनी
स्वत:ला एक शेवटची संधी द्यायची ठरविली.


तसं कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असतांना त्याची एका स्कॉलर मुलीबरोबर मैत्री झाली होती. इतर लोकांना
त्यांची मैत्री प्रेमाच्या मैलाचा दगड गाठेल  असं वाटण्या आधीच दोघांची मैत्री ते “धोक्याचं वळण” शिताफीनं
टाळून “शुद्ध मैत्रीच्या” सुरक्षित मार्गाला लागली होती. पुन्हा हे सारं त्याच्या दृष्टीने, सहज, न घडवलेलं.


भारतातल्या कॉलेज शिक्षणात तिला सुवर्णपदक मिळाले होते नंतर परदेशात उच्चशिक्षणाची संधी मिळाली,
ती ही तिला हव्या त्या विद्यापीठात.  त्याचा ही प्रवास तसा थोडाफार तिच्या सारखाच, म्हणजे अगदी सुवर्णपदक
वगैरे नाही आणि त्या मिळाला त्या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्याने ही  पी एच डी पूर्ण केली आणि एका स्टेट
युनिर्वसिटी मध्ये नोकरी करत होता, गेली कित्येक वर्षे. त्याच्या प्रवासामध्ये सुरुवातीचे काही वर्षे “घरच्या जबाबदाऱ्या”
हा एक महत्वाचा घटक होता. दोन्ही बहिणींची लग्न झाल्यानंतर बऱ्यापैकी नाहीसा झालेला. त्याला आठवत होतं, 
त्याच्या लहान बहिणीचे लग्न झाल्यानंतर तो परत येतांनाच्या विमानप्रवासात त्याला प्रचंड रिकामं वाटलं होतं. आणि
फारसा कधी ही न पिणारा असूनसुद्धा त्याला काही न सुचुन त्याने चक्क दोनदा वाईन मागवली होती. आतासुध्दा
त्याला ते आठवुन हसायला आलं. एकदंरीतच, “समोर असेल त्याला सहजपणे सामोरे जाणे” हा त्याच्या आयुष्यातला
स्थायिभाव होता. 


दोघेही तसे दोन-अडिच तासांच्या अंतरावर राहात होते. त्यांचे आई-वडील म्हणे एकमेकांना भारतात असतांना
ओळखत होते. त्या ओळखीमुळेच मग ह्या दोघांना एकमेकांना भेटण्या बद्दल सुचविण्यात आले. एकमेकांचे
नंबर्स एकमेकांना दिल्या गेले. सुरुवातीचे ऑकवर्ड आणि जुजबी मेसेजेस नंतर ते मुद्द्यावर आले.
कधी भेटायचं? कुठे भेटायचं?


त्याला त्यांची पहिली भेट आठवत होती, स्वत: बद्दल फाजील उत्साहाने सांगावं, असा दोघांचाही स्वभाव नव्हता.
आता तर अशा परिस्थीतीत ते भेटत होते की स्वत: बद्दल आवर्जून सांगावं, अशी गरज ही त्यांना भासत नव्हती.
ती हुशार असल्याचं त्याला माहिती होतंच. त्यामुळे तो थोडा बिचकून होता, पण तिच्या शांत, प्रांजळ आणि
कुठल्याही गोष्टीबद्दल अगदी मुळातून विचार करण्याच्या स्वभावामुळे त्यांची संभाषणं, तो काय करतो
ह्याच्याशी निगडीत राहिली होती. तिने तिच्याबद्दल काय सांगितले हे त्याला जेमतमच आठवत होते,
आणि त्याही पेक्षा त्याने तिला नेहमीप्रमाणे काही न सुचुन फारसे काही विचारलेच नव्हते.


त्यांच्या गेल्या चार महिन्यातील भेटीं चे रंग घेऊन तो अगदी सहजपणे त्यांच्या सहजीवनाचे चित्र रंगवित होता,
पण ह्या क्षणाला प्रथमचा त्याला त्या ते चित्र पुसुन टाकणारा हा विसंवादाच्या रंगाचे अस्तित्व जाणवले.
आणि तो वेड्यासारखा सगळ्या भेटींच्या आठवणी भराभरा उपसुन काढू लागला, ते रंग शोधू लागला ...


त्याला आठवलं, दुसऱ्या भेटीत, तिने त्याला विचारलं होता एक अगदी निरुपद्रवी, आणि कितीतरी ठिकाणी
अगदी सहज विचारल्या जाणारा प्रश्न, “ हाताशी हवा तेव्हढा वेळ आणि पैसा असेल तर तू काय करशील”
आणि पुन्हा वेड्यासारखं काही न सुचुन तो उदगारला होते “प्रवास करीन”. पहिल्या भेटीत “कुठे कुठे फिरला आहेस?”
याचे उत्तर “फारसे कुठे नाही” असे त्याने दिले होते. त्याच्या “प्रवास करीन” ह्या उत्तरावर त्याच्यातली हि विसंगती 
तिने न बोलता त्याच्या कडे फक्त क्षणभर रोखून बघत दाखवून दिली होती.


नंतरच्या  कुठल्यातरी भेटीमध्ये “जेवायला कुठे?” हा यक्षप्रश्न उभा राहिला होता, तेव्हा त्याने “तुला हवं तिथे जाऊ”
असं म्हटल्यावर त्याला तिच्या चेहऱ्यावर क्षणभर कां होईना स्मित झळकेल, असं त्याला वाटलं होतं पण तिचा
चेहरा मात्र त्याच्या उत्तराने आणखीनच प्रश्नांकीत झाला होता.


आणखी एका भेटीत ती ठरविले, की एक छोटीशी ट्रेल करुया, त्याने अर्थातच स्वभावानुसार काही न सुचुन
होकार दिला. एका ठिकाणी चढून जात असतांना त्याने तिला चढून जात असतांना हात पुढे केला, तिने
हो न धरता, फक्त त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा त्याला तिच्या चेहऱ्यावर दिसले ते एक प्रश्नचिन्ह !!


तसे ते नेहमीच विकेंड ला भेटायचे, पण कधीतरी तो कामानिमित्त तिच्या भागाजवळ पोहचला होता. मेसेज
करुन बराच वेळ वाट पाहून त्याने शेवटी फोन लावला तर तोही एगेंज्ड. थोड्या नाराजीनेच तो तिथून निघाला.
त्याच्या त्या मेसेज ला उत्तर नाही, आणि भेटल्यानंतर जेमतेम सॉरी ह्या पलिकडे तिच्याकडून काही आलं नाही.


एकदा पुढच्या भेटीत काहीतरी ऑउटडोअर activity करुया म्हणून तिने मेसेज केलेला. त्याला कामामुळे,
किंवा इतर काही कारणांमुळे त्याने उत्तर दिले गेले नव्हते आणि तिने ही पुन्हा त्याबद्दल त्याला टोकून त्या
बद्दल विचारलं नव्हतं. त्याला तेव्हा वाटलं तिला त्याचे फारसे काही वाटले नाही म्हणून, पण तेव्हा त्याच्या
मनाने दुर्लक्षलेली तिची निराशा त्याला आज लख्खपणे दिसली.  


एका भेटीनंतर पोहोचल्या वर नक्की मेसेज कर, असे त्याने तिला आवर्जून सांगितले होते, ती ते सोयिस्कर
पणे विसरली होती आणि त्याने ही सहजपणे ना स्वत:हून तो प्रश्न विचारला होता ना तिला त्याबद्दल विचारले होते.


हे आणि असे अनेक विसंवादाचे क्षण त्याच्या मनात निराशेची ची सावली पसरु लागले.


म्हणजे ह्या नात्याच्या शेवटाची सुरुवात तर कितीतरी आधीच झाली नव्हती कां? अगदी नक्की केव्हापासून
असं सांगणं तर शक्य नाही. कारण ती कितीतरी अश्या क्षणांमध्ये विखुरली होती. त्याच्या डोळ्यासमोर
त्यांच्या सहजीवनाच्या चित्राचे तुकडे पसरले होते, आणि नेहमी प्रमाणे त्याने काही न सुचुन ते बाजूला सारले.
हे असे कां घडले हा प्रश्न त्याने आतापर्यंत कधीव स्वत:ला विचारला नव्हता, तो यावेळेही त्याच्या मनात
आला नाही. आणि तो टिव्ही चालू करुन निर्बुध्दपणे समोर दिसत असलेला कुठलातरी गेम बघत बसला. 

लमाल ऑगस्ट २०१९ "सुरुवात"

Saturday, June 15, 2019

धोक्याचे वळण

 लहानपणा पासून मला वळण लावण्याचे अनेकांनी अतोनात प्रयत्न केले. विशेषत: माझ्या आईने पण तिच्या अथक प्रयत्नांनी माझी इतर भावंडे अगदी वळणदार झाली,  आणि भांवडेच काय आमच्या घरातील कुत्रा आणि शेजाऱ्यांच्या मांजरीलाही ही वळण लागले. म्हणजे तेव्हा अगदी ही तुमची alexa जर असती आमच्या घरी तर तिला सुद्धा वळण लागले असते, पण मी मात्र आपली मी तरिही अगदी सरळच राहिले.



आईचं वळण तर मला वळसा घालून गेलं, पण “ हिंदी चित्रपट गीते” ह्या एका स्रोतामुळे आयुष्यातले अनमोल धडे मला मिळाले.  त्यातला एक अत्यंत महत्वाचा म्हणजे, आयुष्यातल्या धोकाच्या वळणांबद्दलचा.


सोळावं वर्ष लागलं की एका रात्रीत काहीतरी आमूलाग्र बदल होऊन आपल्या आयुष्याच्या वाटेवर “ते” धोक्याचं वळणं
लागतं, आता “ते” म्हणाजे तुम्हाला कळलं नसेल तर, जरा ह्या ओळींवरुन ते स्पष्ट होईल:


मै सोला बरस की तू सतरा बरस कां, मिल ना जाये नैना
एक दो बरस जरा दूर रहना, कुछ हो गया तो फिर ना कहना !


किंवा माझ्या आधीच्या पिढीतले तुम्ही असाल तर, हे ऐका:


जवानी मस्त है डगर,  जरा संभल के चलो ...ये बेखूदी का है सफर,  जरा संभल के चलो


हे जरा जास्तीचं जुनं वाटलं असेल तर हे ऐका:


चुनरी सम्भाल गोरी, उड़ी चली जाए रे
मार न दे डंक कहीं, नज़र कोई हाय
देख देख पग न फिसल जाए रे


मग आता कळतंय कां मी कशाबद्दल बोलतेय ते. म्हणजे त्या वयात आल्यावर काहीतरी वाटणार हे नक्कीच आहे, पण तरिही हे  “धोक्याचे वळण” कसंही करुन टाळायलाच हवं, हे हिंदी चित्रपट गीतांनी इतक्या विवीध तऱ्हेने मांडले आहे की ही सर्जनशीलता पाहून नतमस्तक होण्याखेरीज आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही.


हे ऐका:


थोडासा ठहरो, करती हू तुमसे वादा पुरा होगा तुम्हारा इरादा,
मै हू सारी सारी तुम्हारी फिर काहे तो जल्दी करे


ह्या ओळींमध्ये  तर “सब्र का फल मिठा होता है” ह्या उक्तीप्रमाणे ती म्हणजे एखादी “winning trophy” च आहे, आणि
थांबल्यातरच ती मिळते हे सांगितले आहे.


हाच “धोक्याचे वळण जरा थांबा” चा इशारा ह्या गाण्यातही मांडला आहे,


ये कली जबतलक फुल बनके खिले, इंतजार इंतजार इंतजार करो इंतजार करो
इंतजार वो भला क्या करे तुम जिसे बेकरार बेकरार बेकरार करो


यात तर हिंदी सिनेमावाल्यांच्या अत्यंत आवडीची प्रतिकं, म्हणजे कळी, फुलं वापरली होती. काय म्हणता “आवडीची” कशावरुन? हा घ्या पुरावा:


अठरा बरस की कंवारी कली थी , घूँघट में मुखड़ा छुपाके चली थी
फँसी गोरी, फँसी गोरी चने के खेत में, हुई चोरी चने के खेत में


इथे त्या अठरा वर्षाच्या कळीची झालेली फसवणूक  आणि कशाची तरी झालेली चोरी ही किती आनंदी स्वरात
सांगून तुम्हाला सावध केल्या गेलंय.


आणि पुन्हा तुम्ही जर माझ्यासारखी कानावर पडेल तेव्हा आणि पडेल ती गाणी ऐकली असशील तर हे ही तुम्हांला
माहिती हवं:


कच्ची कली कचनार की क्या समझे की बाते प्यार की
…. आने को दे ऋतु बहार की


कळी चे फुल होणे ह्याच प्रतिकाचे पुढे म्हणजे कळीचे फुल झाल्यानंतर पण दोन फुलं एकमेकांवर आपटतांना दाखवून त्यांनी “ते” धोक्याचे वळण यशस्वी रित्या (म्हणजे नक्की काय ते विचारु नका) टाळले आहे असा संदेश अल्पमती प्रेक्षकांना देतात.


हयात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे फक्त समाजच हा “संस्कृती रक्षकाचे” काम करित नव्हता तर प्रेमाच्या आणाभाका घेतलेला प्रियकर सुद्धा हे कार्य इमाने इतबारे पार पाडीत होता:
आँखों आँखों में आँखों आँखों में बात होने दो
मुझको अपनी बाहों मे सोने दो
शादी हो जाने दो
शादी हो जायेगी ….


मुखातून सावधगिरीचा इशारा आणि तो इशारा धुडकावून लावण्याची पडद्यावरची कृती हे एकाच गाण्यात दाखवून, ह्या हिंदी चित्रपट गीताने एक वेगळीच उंची गाठली आहे:


रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना
भूल कोई हमसे ना ना हो जाये ...


तो इशारा टाळल्यानंतर चे अटळ प्राक्तनाचे दर्शन आपल्याला ह्या चित्रपटात घडले होते.

तर माझी आशा आहे की आपणही ही असली हिंदी चित्रपट गीते ऐकली असतील आणि  योग्य वयात “धोक्याच्या वळणांचा” इशारा तुम्हांला ही मिळाला असेल. अर्थात ही गाणी ऐकून तुम्हांला ती धोक्याची वळणे टाळाविशी वाटली होती की त्या वळणांनी तुम्हांला मोहीत केलं होतं हा हिशोब तुमचा तुमच्यासाठी.

लमाल जून २०१९ "वळण"

Saturday, February 16, 2019

कारण आणि सबब

प्रिय,

पत्र लिहीण्यास कारण की …..

आपल्या सुरुवातीच्या शालेय मैत्रीच्या काळात आपण “पत्र लिहिण्यास कारण की” ह्या मायन्याला
हसत असू.  कारण आपली सगळी पत्र ही कारणशिवायच असायची,  पत्र म्हणजे ह्या ह्रदयी ची त्या
हृदयी पोचवण्यासाठीचे माध्यम होते.  दिवसभर बरोबर राहून सुद्धा रात्री झोपायच्या आधी काहीतरी
लिहायचे असे एकमेकींना. कुठलीही गोष्ट वाटली की नकळत ती करुन जाण्याचे ते निरागस दिवस.

नंतर उच्च शिक्षणासाठी दोघीनींही गाव सोडले आणि पुणे गाठले. मी तर काही वर्षे देशाबाहेर पण
राहून आले. आपण अगदी सहज दूर झालो. आपल्या मैत्रीत तेवढी परिपक्वता नक्कीच होती.
आपल्या भेटी विरळ होऊ लागल्या. पण  “ही माझी लहानपणाची घट्ट मैत्रिण” ही ओळख मात्र
एकमेकींच्या मनात कायम राहीली.

आणि काही वर्षांनी ध्यानी मनी नसतांना नोकरीच्या ठिकाणी आपण अचानक भेटलो, तु त्या कंपनीत
आधी पासूनच रुळलेली होतीस. मी मात्र नवीन, पण तू आणि तुझ्या ग्रुप ने मला लवकरच स्वीकारले.
लंचटाईम च्या व्यतीरिक्त आपण दोघी रोज अर्धा तास चालायला जात असू. आणि तिथे आपल्या
मैत्रीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.

मुलं तशी सुटी झाली होती आपली, त्यामुळे आयुष्यात तशी स्थैर्यता आली होती, आणि मग त्या
काही वर्षात आपण पुन्हा एकदा जवळ आलो. कधी मधी मुलं- नवऱ्या बरोबर पण आपल्या
भेटी व्हायच्या. तुझ्या बरोबरीनं माझ्या इतर ही ओळखी झाल्या होत्या, आणि रुपा, मैथिली
तर माझ्या छान मैत्रिणी झाल्या होत्या.आयुष्याला एक सहजसुंदर लय आली होती. खरंच
किती छान काळ होता तो. बरीच वर्षे गेली त्या लयीत. लंचटाईम मध्ये बोलतांना कधीमधी
रिटायरमेंट चा विषय निघत होता….

आणि एका रविवारी दुपारी बाल्कनी मध्ये आराम खुर्चीत बसलेला महेश उठलाच नाही. Massive
हार्ट अऍटक !  मी वरती काही आवरासावर करीत होते, महेशने आवाज  दिला नाही की तो मला ऐकू
आला नाही हा प्रश्न अजूनही माझे ह्रदय विदिर्ण करुन जातो.

मुलं लगेच मिळाल्या त्या साधनाने घरी आली. दोन आठवडे झाल्यावर मी नोकरीवर रुजु झाले
पण मी पुर्वीची मी राहिले नव्हते. सगळ्यांना दु:खातून सावरेल हळू हळू असं वाटत होतं. रुजु झाल्यानंतर
दोन महिन्यातच मी नोकरीचा राजिनामा दिला. तुला आणि इतर सगळ्यांना धक्काच बसला. सगळ्यांनी
मला हरतऱ्हेने सांगून पाहिलं, पण माझं उत्तर “ आता काही नको वाटतंय”, कुणासाठीच समाधानकारक
नव्हतं, माझ्याशिवाय.
तुम्हांला सगळ्यांना मी काहीही सबबी सांगतेय वाटत होतं, तुम्हांला माझा राग येत होता, माझा निरोप
समारंभ पार पडेपर्यंत तुझा मी सोडून जातेय, यावर विश्वास नव्हता. मला तुला होणारा त्रास दिसत
होता पण मी मनाचे दरवाजे बंद करुन घेतल्यागत माझ्या पर्यंत पोचत नव्हता. अगदी काही वर्षांचा
प्रश्न असतांना, मी असं हे नोकरी सोडून जाण्याचा वेडेपणा कां करतेय हे कळतं नव्हतं. “ आता मन
लागत नाही” हे माझं उत्तर तुम्हाला सबब वाटत होती.

जगण्यासाठी कारण नसणं, हे मी अनुभवत होतेे. रोजचा दिवस उगवायचा तोच मनावर मणामणांचे ओझे
घेऊन. आतापर्यंतचे आयुष्य मी आणि महेश ने आपापल्या नोकऱ्या, करियर सांभाळून एकत्र घालविले होते.
पण उर्वरित आयुष्याचे सगळे बेत, सगळ्या शक्यता, हे आमचे होते. महेश नसतांना रोज कारने घर ते office
हा प्रवास हे सुद्धा माझ्यासाठी एक अग्निदिव्य झालं होतं. अगं, मी माझ्या आजूबाजूला असलेल्या जगाशी
सबंधच जोडू शकत नव्हते. माझ्याजवळ लक्षच नव्हतं तर मी काम तरी कसे करणार? नोकरी सोडल्यावर,
मला हे स्विकारावं लागलं की मला मदत हवीये, आणि मी मदत स्विकारली. जवळपास, वर्षभर कौन्सेलिंग
केल्यानंतर, मला कुठे मी सापडू लागले आहे. तो म्हणतो, “जगण्याला कारण नसतंच, आपण ते
आपल्या आयुष्यात शोधायचं असतं, आपण करत असलेल्या गोष्टींना त्या त्या वेळेला आपल्या जगण्याचं
कारण बनवायंचं असतं. “

महेश असेपर्यंत सर्वसामान्यासारखं मी पण माझी जगण्याची कारणं, मुलंबाळं, नोकरी, संसार माझ्या
नकळत निर्माण करत होते, जगत होते. पण ती कारणं मी निर्माण केलेली आहे, हे मला कळलं
महेशच्या जाण्यानंतर!

मी तुम्हांला सांगत असलेली सबब नव्हत्या, ते कारण होतं. हे, एवढंच सांगण्यासाठी हे पत्र ! तुला लिहीत
राहीन मी. कारणाशिवाय ! माझं तुला  हे पहीलंच कारणासाठी लिहिलेलं पत्र !