परवा कुणीतरी तावातावाने सांगत होतं,
माझ्याघरी चोरी झालीये, सगळं सगळं चोरीला गेलंय!
माझं सगळं घर साफ केलंय,
माझं असं काहीच उरलं नाही,
सगळं संपलं !
त्याच्या कानावर हे शब्द पडले,
त्याला मनापासून हसायला आलं !
त्याच्या आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा
त्याच्या डोळ्यासमोरुन झरझर सरकून गेला आणि
तो एका सुजाण, जाणकार प्रेक्षकासारखा
त्यातली मर्मस्थळे न्याहाळू लागला !
नकळत्या वयात घरच्या वाईट परिस्थीतीची
जाणीव त्याला करुन देण्यात आली आणि
त्याची अनमोल किंमत कळायच्या आत
त्याचा निरागसपणा चोरीला गेला !
वयाशी प्रामाणिक राहून त्याची स्वप्नं फुलली,
घरट्या बाहेर पडून उंच भरारी घ्यायला आसुसली!
पण शिक्षण संपता संपता वास्तवतेची झळ
त्याला लागली, व्यवहाराची गणित सोडवतांना
त्याच्या स्वप्नांची मात्र चोरी झाली !
यानंतरच्या चोरीने मात्र त्या आयुष्यात वसंत बहरला
आणि एक सुगंधी ऋतु त्याच्या आयुष्यात फुलला!
जे विकत घेता येत नाही, पण क्षणात चोरता येतं,
कुणा एकासाठी जे कवडीमोल आहे,
पण त्या दोघांसाठी मात्र अनमोल असतं, अशा प्रेमासाठी,
त्याचं अगदी त्याच्या देखत हृदय चोरीला गेलं!
लग्न, संसार सुरु झाला,
जबाबदार्या घरच्या, बाहेरच्या आणि दारच्या !
मुलंबाळं, त्यांच्या शाळा, त्याची नोकरी,
पैशाला वाटा हजार, आणि त्या बुजवता बुजवता
रहाटगाडग्याला बांधला गेला तो दिवस आणि रात्री !
त्याला कळले सुद्धा नाही केव्हा त्याचा वेळ चोरीला गेला!
धकाधकीची वर्षे उडून गेली, पण
आयुष्याची पद्धत मात्र नाही बदलली
सतत कशातरी मागे धावायची,
सवय तशीच राहीली !
सगळं जागच्या जागी असून काहीतरी खुपतंय,
जाच्यासाठी धावतोय ते मिळून सुद्धा उर धपापतोय!
जी पेटी त्याच्या मनाच्या कोपर्यात होती पडून,
ज्यात ठेवली होती त्याने शांतता जपून
जरा गडबड संपली की तेव्हा लागेल म्हणून.
आता लक्षात येतंय, पण काय करावं ते सुचत नाही
जी त्याची हक्काची गोष्ट समजत होतो तो,
तीच त्याला आता सापडत नाही, कारण
त्याच्या शांततेची किल्ली चोरीला गेलीये !
No comments:
Post a Comment